कोलकाता नाईट रायडर्स की मुंबई इंडियन्स? कोण पोहोचणार प्लेऑफमध्ये, आज होणार स्पष्ट
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2021/10/kolkata-knight--750x430.jpg)
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचणार आहे. आता साखळी टप्प्यातले फक्त चार सामने खेळले जाणार आहेत. पण प्लेऑफमध्ये चौथा संघ कोण असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे या आयपीएलमधला थरार शिगेला पोहोचला आहे. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू हे तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. चौथ्या स्थानासाठी लढाई कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु आहे. केकेआर आणि मुंबई इंडियन्सचा अजून एक एक सामना राहिला आहे.
केकेआरने आयपीएल 2021 मध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी 6 सामन्यांत विजय मिळवला आहे आणि 7 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 13 सामने खेळल्यानंतर कोलकाताला 12 गुण मिळाले आहेत आणि त्यांचा नेट रन रेट +0.294 आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा संघ अगदी शेवटच्या क्षणी फॉर्ममध्ये परतला आहे. शेवटच्या खेळलेल्या सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सचा दणदणीत पराभव केला आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. मुंबई आणि कोलकाताचे समान गुण आहेत, परंतु नेट रन रेटच्या बाबतीत केकेआर रोहितच्या मुंबई इंडियन्सपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. मुंबईचा रन-रेट -0.048 आहे, ज्यामुळे तो टॉप -4 च्या बाहेर आहे.
कोलकात्याचं प्लेऑफसाठीचं समीकरण खूपच सोपं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना जिंकायचा आणि प्लेऑफमधलं स्थान पक्कं करायचं, एवढा सीधा साधा मामला… या विजयासह त्यांचे 14 गुण होतील. यासह, त्यांचं रन रेटही सुधारणार आहे. मात्र, केकेआरचा राजस्थान रॉयल्सविरुद्धचा शेवटचा सामना वाटतो तेवढा सोपा नक्कीच नसेल. या हंगामात यूएईमध्ये 5 पैकी फक्त 1 सामना जिंकले असला तरी मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. राजस्थानला पराभूत केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अंतिम फेरी खेळण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. केकेआरने राजस्थानविरुद्ध शेवटचा सामना गमावला तरच मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचेल. यासाठी मुंबईला त्यांचा शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जिंकावा लागेल.