असं काय झालं, अमिताभ बच्चन यांनी ‘ती’ जाहिरात करण्यास दिला नकार!
मुंबई: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे आणि जाहिरीतीचे वेगळेच नाते आहे. अमिताभ आजपर्यंत अनेक जाहिरातीत काम केले आहे. अमिताभ यांनी केलेल्या कोणत्याही जाहिरातीवर लोक अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र अलिकडे अमिताभ यांनी पान मसाल्याची जाहिरात केली ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता अमिताभ यांनी आज त्यांच्या वाढदिनी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी या कंपनीला नकार देत त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार संपवला आहे.
अमिताभ बच्चन कमला पान मसालाच्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. पान मसाल्याची जाहिरात करत असल्याच्या मुद्द्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तर काहींनी आक्षेप घेत टीकाही केली. मात्र, त्यावेळी बच्चन यांनी व्यावसायिक कारण दिलं होतं.
पान मसालाच्या जाहिरातीमुळे लोक सातत्याने टीका आणि ट्रोल करत असतानाच आता अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीतून माघार घेतली आहे. अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीतून आपलं नाव मागे घेतलं आहे. त्याचबरोबर कंपनीने जाहिरातीसाठी दिलेली आगावू रक्कमही बिग बी कंपनीला परत करणार आहेत. सर्वसामान्य लोकांबरोबरच राष्ट्रीय तंबाखू विरोधी संघटनेनंही अमिताभ बच्चन यांना पान मसाल्याची जाहिरात न करण्याचं आवाहन केलं होतं. नव्या पिढीला पान मसाला सेवनासाठी प्रोत्साहन मिळू नये म्हणून जाहिरातीतून माघार घेत असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.