रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली, शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या गाडी पेटवली

5

बुलढाणा: सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते असलेल्या तुपकरांचं गेल्या ३ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. नागपूरमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी तो हाणून पाडत त्यांना बुलढाण्यात राहत्या घरी पाठवण्यात आला होत. बुलडाण्यात स्वाभीमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलकांकडून तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला. गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे.

दरम्यान तुपकरांच्या या आंदोलनाला स्थानिक शेतकऱ्यांचा चांगलाच पाठींबा मिळताना दिसत आहे. काल बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जागोजागी रास्तारोको केला. ज्यात औरंगाबाद-अमरावती, औरंगाबाद – नागपूर, बुलडाणा – अजिंठा, बुलडाणा – अकोला, बुलडाणा- चिखली, बुलडाणा- मलकापूर असे महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरले. सध्या तुपकरांना मिळणारा पाठींबा लक्षात घेता विदर्भ आणि मराठवाड्यात हे आंदोलन पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8 हजार रुपये आणि कापसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा यासाठी तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.

दरम्यान आंदोलनाला तीन दिवस होऊनही अद्याप कोणत्याही राजकीय नेत्याने तुपकरांची दखल घेतलेली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तुपकर यांच्या आई आज आंदोलनस्थळी दाखल झाल्या होत्या. आपल्या मुलाची बिघडलेली तब्येत पाहून तुपकरांच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. आपल्या मुलाला काही झालं तर त्याला सरकार जबाबदार राहिल अशी प्रतिक्रीया तुपकर यांच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.