मुख्यमंत्री दोन दिवसात सभागृहात येतीलही, पंतप्रधान तंदुरुस्त, संसदेत का येत नाहीत – संजय राऊत

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे ते सभागृहात येऊ शकले नाही. पण ते कामकाजाकडे लक्ष ठेवून आहेत. अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसात सभागृहात येतीलही. पण पंतप्रधान तंदुरुस्त आहेत ते संसदेत का येत नाहीत?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. आम्हीही पंतप्रधानांना संसदेत शोधत होतो. ते मला उत्तर प्रदेशात दिसले. परदेशात दिसले. पुतीन यांना मिठी मारताना दिसले. पण संसदेत दिसले नाही. संसद सुरू असते तेव्हा पंतप्रधानांनी संसदेत यावं असे संकेत आहेत. ती परंपरा आहे. पण पंतप्रधान येत नाहीत. मुख्यमंत्री दोनचार दिवसात येतीलही, पण पंतप्रधान का येत नाही? असा सवाल राऊत यांनी केला.

मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही. शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना काही पथ्य होती. ती पूर्ण झाली आहेत. विरोधकांनी या गोष्टीचा फार गाजावाजा करू नये. माणुसकी दाखवली पाहिजे. पुढच्या तीन चार दिवसात मुख्यमंत्री विरोधी पक्षांना दिसतील. ते सर्व कामकाजांवर लक्ष ठेवून आहे, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांची नजर कमजोर झाली आहे. त्यांना दिसत नाही. ऐकायला येत नाही. त्यांना मेडिकल हेल्पची गरज आहे. आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ, असा चिमटाही त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी राम मंदिर परिसरातील घोटाळ्यांवरूनही टीका केली. मुंबईतील लहान सहान गोष्टी भूखंड, व्यवहार याचा बाऊ करणं हा सध्या भाजपचा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम झाला आहे. भाजपच्या काही लोकांच्या सूचनेनुसार आघाडीच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत. काही प्रकरण खोटी आणि बोगस आहेत. काल राम मंदिराच्या आसपासच्या जमिनी भाजपच्या परिवाराने हडप केल्याचं उघड झालं. त्यात भाजप पदाधिकारी, महापौर, नातेवाईक, आमदार, खासदार आणि नोकरशाहींनी राम मंदिर परिसरात जमिनीची खरेदी केली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी लढले कोण, मेले कोण आणि रामाच्या नावावर पैसे जमा करतो कोण? हा प्रश्न नकली हिंदुत्ववाद्यांना विचारला पाहिजे. आम्ही तो विचारला आहे, असं ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!