आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा…. शिक्षेनंतर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना आज नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. २०१७ सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामात अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
आज न्यायालयाने बच्चू कडू याची दमदाटी करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे , या दोन कलमांतर्गत दोषी ठरवले आहे. या निकालावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, २०१७ साली दिव्यांग बांधवांनी नाशिक आयुक्त कार्यालयात दोन आंदोलन केली होती. अपंगांसाठी असलेल्या निधीचा तीन- तीन वर्ष खर्च होत नाही, त्यामुळे अंदोलन कर्त्यांनी आम्हाला फोन केला. मी आयुक्तांना दोन पत्र लिहिली. आमदाराच्या पत्रालाही आयुक्तांनी उत्तर दिलं नाही. सामान्य माणसाचा अधिकार तर खड्ड्यात गेला.
बच्चू कडू पुढे म्हणाले कि, पत्र देऊनही आम्हालाही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन करण्यासाठी आलो होतो. ज्यांना हात , पाय , डोळे नाहीत अशा दिव्यांगांना बांधवांच्या हक्काचा निधी हे अधिकारी खर्च करत नाहीत. म्हणून अंदोलन करावं लागलं. आम्ही आंदोलन केलं म्हणून आम्हाला शिक्षा सुनावली. असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले.