जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सव वर्ष सांगता समारंभ केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न

पुणे : श्रद्धेय स्वर्गीय मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने १९४९ साली स्थापन झालेल्या जनता सहकारी बँकेने ७५ वर्षे पूर्ण करून व्यवसायाचा १५ हजार कोटींचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. या कालावधीमध्ये बँकेसोबत असणाऱ्या सर्व हितचिंतकांचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ देशाचे कणखर गृह तथा सहकारमंत्री अमितभाई शाहजींच्या उपस्थित संपन्न झाला. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बॅंकेच्या सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह बँकेचे अध्यक्ष रविंद्र हेजीब , उपाध्यक्षा सौ. अलका पेटकर , मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप जी तसेच पदाधिकारी, अधिकारी, सभासद आणि मान्यवर उपस्थित होते.
जनता सहकारी बँकेने प्राप्त केलेला विश्वास ही गौरवशाली बाब आहे. जनता सहकारी बँक ही को-ऑपरेटिव्ह बँक नसून एक मोठा परिवार आहे. या बँकेने समाजसेवेमध्येही नेहमीच पुढाकार घेतला आहे. बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे श्रेय संस्थापक, संचालक आणि त्या बँकेच्या सदस्यांना जाते. देशात १ हजार ४६५ को-ऑपरेटिव्ह बँका असून त्यापैकी सर्वात जास्त महाराष्ट्रात ४६० अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका आहेत. सहकार क्षेत्रात प्रगती करत असताना सहकारी बँकांनी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अमित शाह यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी दोन संकल्प केले आहेत. २०४७ पर्यंत देशाला पूर्णपणे विकसित राष्ट्र बनवणे व २०२७ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर बनवण्याचा संकल्प केला आहे. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्राने पुढाकार घेतला आहे. हे संकल्प पूर्ण करत असताना प्रत्येक व्यक्तीला क्षमतेनुसार काम, प्रत्येक परिवार समृद्ध बनवणे आणि प्रत्येक व्यक्तीला देशाच्या विकासात सहभागी करुन घेण्याचे काम सहकार क्षेत्राच्या माध्यमातून होत आहे. सहकार क्षैत्राच्या विकासासाठी सहकारिता मंत्रालयाची स्थापना करण्यात आली, असल्याचे शाह म्हणाले.