जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला विद्यापीठाचा दर्जा मिळणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठातील सर कोवसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात जमनालाल बजाज इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज या संस्थेचा हीरक महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पाटील यांनी त्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उद्योगपती शेखर बजाज आणि अजय पिरामल, एमयूचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मुंबईचे संचालक डॉ. मनोज तिवारी, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि जेबीआयएमएसच्या संचालक प्रा. कविता लघाटे उपस्थित होते.
भारताच्या व्यवस्थापन शिक्षणातील या संस्थेचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. गेल्या ६० वर्षांपासून भारतातील व्यावसायिक नेतृत्व घडवणारी आणि “CEO Factory” म्हणून ओळख निर्माण केलेली ही संस्था आपल्या परंपरेप्रमाणेच आजही तेजस्वी वाटचाल करत आहे. भारतातील व्यवस्थापन शिक्षणातील अग्रणी आणि मुंबई विद्यापीठाचा घटक असलेले प्रतिष्ठित जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आता अभिमत विद्यापीठ बनण्याच्या तयारीत आहे, अशी घोषणा यावेळी चंद्रकांत पाटील केली. उद्योगपती आणि जेबीआयएमएसचे माजी विद्यार्थी अजय पिरामल यांच्या नेतृत्वाखालील एक सदस्यीय समिती या परिवर्तनाचे पर्यवेक्षण करेल. या परिवर्तनात सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे पाटील म्हणाले. जेबीआयएमएसला डीम्ड-टू-बी विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यावर, जगभरातील विद्यार्थी मुंबईतच जागतिक दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण घेऊ शकतील, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
मंत्री आशिष शेलार यावेळी म्हणाले, ही हीरक महोत्सवी वर्ष जेबीआयएमएससाठी शेवटची वेळ नाही तर एक नवीन सुरुवात आहे. भारत वेगाने जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, आपल्या व्यवस्थापन संस्थांनी तांत्रिक नवोपक्रमाला शैक्षणिक कठोरतेशी जोडणे आवश्यक आहे. वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज असलेले जागतिक नेते तयार करण्यात जेबीआयएमएसने नेतृत्व केले पाहिजे.