आरफळ कालवा उन्हाळी आवर्तनास 15 मे पर्यंत मुदतवाढ, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतल्याने लाभधारकांना दिलासा

15

सांगली : आरफळ कालव्याचे उन्हाळी हंगाम पाण्याचे आवर्तन ११ मे रोजी संपणार होते. तथापि, आरफळ कालव्याच्या शेवटच्या भागातील व विसापूर-पुणदी योजनेच्या लाभक्षेत्रामधील लाभधारकांची आवर्तन वाढविण्याची मागणी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचेशी उन्हाळी आवर्तन सुरु ठेवण्याबाबत चर्चा केली. तसेच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी देखील त्यांनी समन्वय ठेवला.

या चर्चेच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले तसेच तारळी व आरफळ प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी यांना तारळी प्रकल्पातून सांगली जिल्ह्याकरिता आरफळ कालव्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्या. अशा प्रकारे 15 मे पर्यंत उर्वरित 0.11 टीएमसी ऐवजी 0.21 टीएमसी पाणी विसापूर-पुणदीच्या उर्वरित भागास उपलब्ध होणार आहे.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मार्चमध्ये झालेल्या कालवा सल्लागार समितीची बैठकीत सांगली जिल्ह्याकरिता तारळी प्रकल्पातून कोपर्डी लिंकद्वारे उन्हाळी हंगामासाठी 0.99 टीएमसी एवढी तरतूद करण्यात आली होती व सांगली जिल्ह्याकरिता आरफळ कालव्याचे आवर्तन दि. 26 मार्च पासून सुरु करण्यात आले. उन्हाळी हंगामाकरिता अनुज्ञेय 0.99 टीएमसी पैकी 0.88 टीएमसी पाणी 11 मे पर्यंत वापरण्यात आले. आरफळ कालव्याचे सध्या सुरु असणारे सन 2024-25 मधील उन्हाळी हंगाम पाण्याचे आवर्तन 11 मे रोजी संपणार होते. त्यामुळे लाभधारकांकडून उन्हाळी आवर्तन सुरु ठेवावे अशी मागणी होत होती. त्या पार्श्वभूमिवर 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने सांगली जिल्ह्यातील आरफळ कालवा व विसापूर-पुणदीच्या लाभधारकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.