यावर्षी शासनाच्यावतीने १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनात आपले योगदान द्यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

62

मुंबई : वातावरण बदलामुळे होणारी हानी पर्यावरण संवर्धनातून निश्चितच टाळता येणार आहे. पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू प्लास्टिक असून ‘सिंगल यूज प्लास्टिक’ वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. यावर्षी शासनाच्यावतीने १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

भामला फाऊंडेशन आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वातावरण बदलावर जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अँम्फी थिएटर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमास गोवा राज्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्हो, मुंबई महापालिका सहआयुक्त दिनेश पल्लेवाड, भामला फाउंडेशनचे आसिफ भामला, अभिनेत्री रवीना टंडन, गोदरेज कंपनीचे नादिर गोदरेज, गीतकार स्वानंद किरकिरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कमीत कमी प्लास्टिक वापरून पर्यावरणाची होणारी हानी टाळावी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्याने विघटनकारी प्लास्टिक निर्माण करणे शक्य आहे. प्लास्टिकला पर्याय अशा विघटनकारी प्लास्टिक निर्मिती करावी. राज्यात राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेत केवळ वृक्ष लागवड करण्यात येणार नसून वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या मोहिमेत वृक्षांचे संवर्धनही करण्यात येईल.

देशातील सर्वात मोठे सांडपाणी प्रक्रियेचे जाळे मुंबईत तयार करण्यात येत असून भविष्यात मुंबईतील समुद्रात जाणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया केलेले असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०३० पर्यंत नेट झिरो चे उद्दिष्ट आहे. देशाच्या एकूण ऊर्जे गरजेपैकी ५० टक्के ऊर्जा पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांकडून मिळविण्याचा मानसही आहे. यामध्ये महाराष्ट्र पुढे असून राज्याने २०२६ पर्यंत कृषी क्षेत्राची १६ हजार मेगावॉट ऊर्जा गरज सौर ऊर्जेपासून भागविण्यासाठी काम सुरू केले आहे. राज्यातील महानगरांमधील संपूर्ण सार्वजनिक परिवहन सेवा ग्रीन ऊर्जेवर आणण्यात येत आहे. मुंबईत याची सुरुवातही करण्यात आली आहे. तसेच मुंबई शहरातील संपूर्ण  परिवहन सेवेचे तिकीट ‘सिंगल’ तत्वावर आणण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धन आणि सिंगल यूज प्लास्टिक वापर बंदी जनजागृतीबाबत अभिनेता अजय देवगण यांच्यावर चित्रित ‘प्यासा’ या प्रचार मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.