“संकल्प से सिद्धी तक” हे भारतीय जनता पार्टीचे ब्रीदवाक्य आहे, समृद्धी महामार्ग हे त्याचे उदाहरण – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी फडणवीस यांनी केले. या लोकार्पण सोहळ्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे. संकल्प से सिद्धी तक” हे भारतीय जनता पार्टीचे ब्रीदवाक्य आहे, समृद्धी महामार्ग हे त्याचे उदाहरण असे पाटील यांनी याबाबत म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले कि, महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या” अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाले. “संकल्प से सिद्धी तक” हे भारतीय जनता पार्टीचे ब्रीदवाक्य आहे. समृद्धी महामार्ग हे त्याचे उदाहरण. नागपूरहून मुंबईला जोडणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा संकल्प माननीय देवेंद्रजी यांनी सोडला आणि विरोधाचे डोंगर बाजूला सारून सिद्धीस नेला. त्यांच्या कार्यकाळात भूमिपूजन आणि त्यांच्याच कार्यकाळात लोकार्पण असा आणखी एक योग आज साधला गेला. आज हा महामार्ग पूर्ण क्षमतेने महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झाला. अर्थात पुढे वाढवण बंदरापर्यंत हा महामार्ग नेण्याचा प्रस्ताव आहेच. या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुती सरकारचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरी जवळील बोगदा हा ८ किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारत अडथळे येऊ नयेत म्हणून १०० प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.