नव्या आव्हानांचा सामना करताना विद्यापीठांनी फक्त ज्ञानकेंद्र होऊन उपयोग नाही तर तंत्रशिक्षण, कौशल्य केंद्र बनले पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : मुंबई विद्यापीठात युजीसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “विकास २०२५” पश्चिम क्षेत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेऊन आपले विचार मांडले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात तंत्रज्ञान, नव विचार आणि बौद्धिक क्षमतेला कौशल्य विकासाच्या सोबतीने विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र या परिवर्तन यात्रेत महत्वाची भूमिका बजावीत आहे. राज्यात शिस्तबद्ध पद्धतीने नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात गुणात्मक बदल करण्यात येत आहेत, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले, नव्या आव्हानांचा सामना करताना विद्यापीठांनी फक्त ज्ञानकेंद्र होऊन उपयोग नाही तर तंत्रशिक्षण, कौशल्य केंद्र बनले पाहिजे, असेही नमूद केले. भविष्यात शिक्षण ही केवळ पदवी देणारी व्यवस्था असणार नाही तर कौशल्य ज्ञान आणि तंत्रज्ञानाने युक्त अशी शिक्षणपद्धती बनविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
व्यासपीठावर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ निर्मलजीत सिंह कलसी, नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठाचे कुलगुरू राणा प्रताप सिंह, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष दीपक कुमार श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य एनईपी सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा नितीन करमळकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे उपस्थित होते. यासोबतच महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण दिव प्रदेशातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.