राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्याबाबत राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्याबाबत राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक संपन्न झाली. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात बैठकीसाठी राज्यातील सर्व प्रमुख शासकीय विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते. नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठे राज्यातील प्रमुख शहरात पदार्पण करण्याच्या तयारीत असून, त्यांच्या स्पर्धेसाठी राज्यातील विद्यापीठांनी आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीचा वापर करण्याची गरज या बैठकीत पाटील यांनी व्यक्त केली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती यासह अनेक योजना आहेत. त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी नेमावेत, ऑपरेशन सिंदूर मुळे राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली आहे, या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन शिक्षणातून विद्यार्थी घडवितांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय अस्मिता यांचे धडे दिले जावेत, यासाठी एनसीसी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, अशा सूचनाही दिल्या तसेच, विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल 30 दिवसात लागावेत यासाठी प्रयत्न केले जावेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी सूचित केले.
बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सुकाणू समितीचे प्रमुख डॉ.नितीन करमळकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविंद्र कुलकर्णी यांची उपस्थिती होती.