दैनिक सकाळच्या वतीने आयोजित “विद्या एज्युकेशन एक्स्पो”चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

14

पुणे : दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, करिअरच्या संधी समजून घेता याव्यात आणि ध्येय निश्चित करता यावे, यासाठी दैनिक सकाळच्या वतीने “विद्या एज्युकेशन एक्स्पो”चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, लक्षद्वीप या चार राज्यांमधील ११० विद्यापीठांचे कुलगुरू, प्रा-कुलगुरू आणि उद्योजक यांची बैठक नुकतीच मुंबईत झाली. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाचा व्यवहारात उपयोग झाला पाहिजे असे शिक्षण देण्याची व्यवस्था उभारण्याची गरज या बैठकीत अधोरेखित करण्यात आली. आता राज्यात तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम असल्यास, त्यात सहा महिने प्रत्यक्ष अनुभवावर आधारित ज्ञान अनिवार्य केले असल्याचे पाटील म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले, एकेकाळी आपल्याकडे विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी घेऊन त्याआधारे संबंधित विद्यार्थ्यांनी कोणता अभ्यासक्रम निवडावा, हे सांगणारी शिबिरे आयोजित केली जात होती. आजही अशा प्रकारची शिबिरे होत आहेत. परंतु, आता विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता काय सांगते, यापेक्षा अधिक संबंधित विद्यार्थ्याने काय केल्यास तो भविष्यात यशस्वी होईल हे कळण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला यावेळी पाटील यांनी दिला.

यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, दैनिक सकाळचे समूह संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादिका शीतल पवार, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु पराग काळकर यांच्यासह पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.