ज्येष्ठ स्वयंसेवक, राष्ट्रवादी विचारधारेचे प्रखर पुरस्कर्ते, ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचे निधन… त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली वैचारिक पोकळी भरून न निघणारी – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : ज्येष्ठ स्वयंसेवक, राष्ट्रवादी विचारधारेचे प्रखर पुरस्कर्ते, ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचे रविवारी निधन. कुलकर्णी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे कडवट समर्थक होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली वैचारिक पोकळी भरून न निघणारी आहे. त्यांच्या तेजस्वी लेखणीला आणि त्यागी जीवनाला आमची आदरांजली!, असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी अरविंद कुलकर्णी यांना मन:पूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादाची धार अजून तीव्र करणारा, प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे राष्ट्रीय विचार मांडणारा, महाराष्ट्राच्या राजकारणावर अत्यंत सखोल दृष्टिकोन असलेला आणि तरुण पत्रकारांना दिशादर्शन करणारा प्रेरणास्रोत पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांची लेखणी ही केवळ माहिती देणारी नव्हती, तर ती विचार जागवणारी होती. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रनिष्ठ पत्रकारितेसाठी अर्पण केले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली वैचारिक पोकळी भरून न निघणारी आहे. त्यांच्या तेजस्वी लेखणीला आणि त्यागी जीवनाला आमची आदरांजली!, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी आपल्या परखड विचारांच्या माध्यमातून हिंदुत्व, सावरकर विचारांचा प्रसार केला. अधोरेखित या त्यांच्या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून ते सातत्याने हिंदुत्वविषयक विचारांची परखड मांडणी करत असत. अत्यंत धीरगंभीर अशा बोलण्यातून त्यांनी सोप्या भाषेत अनेक विषय आपल्या श्रोत्यांना, चाहत्यांना समजावून सांगितले. पत्रकार या नात्याने त्यांच्या गाठीशी मोठा अनुभव होता. संयमी बोलण्यातून ते राजकीय, सामाजिक, इतिहासविषयक विषयांची सुरेख मांडणी करत असत.