मोदी सरकारची कामगिरी आणि लोकोपयोगी योजनांची माहिती वारकऱ्यांना व्हावी यासाठी डिजिटल रथाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उदघाटन.. रथ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

62

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वातीत केंद्र सरकारने सेवा, सुशासन व गरीब कल्याणाची अकरा वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली. या अकरा वर्षांतील मोदी सरकारची कामगिरी आणि लोकोपयोगी योजनांची माहिती वारकऱ्यांना तसेच नागरिकांना व्हावी, या दृष्टिकोनातून माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो तर्फे सुरू करण्यात आलेल्या दृक-श्राव्य स्वरूपात माहिती देणाऱ्या डिजिटल रथाचे उद्घाटन गुरुवारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन करून हा रथ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आला.

मोहोळ यांनी माहिती दिली कि, वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची परंपरा असून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला लाखो वारकरी सहभागी होतात. या वारीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या गेल्या अकरा वर्षांतील कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दोन डिजिटल रथ वारी मार्गावर जाणार आहेत.

मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर शक्तिशाली, सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून ओळख निर्माण केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ या विजयानंतर हे अधोरेखित झाले. गेल्या ११ वर्षांत देशातील सुमारे २५ कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. या अकरा वर्षांत अनेक गरीब कल्याण योजना राबविल्या गेल्या व आत्मनिर्भर, समृद्ध भारताचा पाया घालण्यात आला. मोदी सरकारच्या गेल्या ११ वर्षांतील सर्व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत या डिजिटल रथांच्या माध्यमातून पोहचवली जाणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

याप्रसंगी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्र महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.