पुण्यनगरीत भक्ती-शक्तीचा सुरेख संगम… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लाखो वारकऱ्यांनी केला योगाभ्यास

42

पुणे : आषाढी वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी दाखल झाल्या आहेत. यंदा त्याच वेळी जागतिक योग दिन आला असल्याने उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू, विद्यार्थी विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात अलौकिक भक्तीयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लाखो वारकऱ्यांनी योगाभ्यास केला. आजचा हा भक्ती-शक्तीचा संगम असलेला कार्यक्रम वेगळीच अनुभूती देणारा होता, अशा भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिनाचा प्रस्ताव मांडला त्यानुसार हा दीन साजरा केला जातो. आज एकाच वेळी भारत आणि जगातील जवळपास १० कोटी लोक योग करत असतील अशी अद्भुत किमया झाली आहे. ५ हजार वर्षांपासूनच्या इतिहासातील योगा, ध्यान, यज्ञाचे महत्त्व पुन्हा एकदा जगाच्या लक्षात आले असून यातील विज्ञानाचे सर्व जग अनुसरण करत आहे. आषाढी वारीसाठी दिंड्या जातात अशा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम साजरा केला जावा अशी संकल्पना समोर आली, त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. योग हा शरीर आणि मनाला सर्वार्थाने पुनरुज्जीवीत करणारा असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, योगाचे हे आमचे प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व देशांनी पाठिंबा दिलेला हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात एकमात्र प्रस्ताव आहे. गेले ११ वर्ष जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे.

योगसाधना कोणालाही करता येते. शरीर, मनाला आणि शरीरातील सर्व चक्रांना पुनुरुज्जीवित करत उभारी देण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते. ही सर्व आसने शरीराची रचना लक्षात घेऊन रचलेली आहेत. नखापासून केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयवाला दिशा देण्याची आणि उपचार करण्याची रचना योगासनात आहे. जगामध्ये योगासनाकडे उपचार शक्ती (हिलींग पॉवर), आरोग्यदायी जीवनशैली (वेलनेस) म्हणून पाहिले जाते.

यावर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘एक भूमी, एक आरोग्य’ हा संदेश कृतीतून देणारा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वारकऱ्यांसोबत योगासन करणे ही एकप्रकारे आनंदाची पर्वणी आहे. आज सर्व दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी योगासन करत आहेत. तसेच ७०० महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील योगासनात सहभागी झाले आहेत, ही आनंदाची बाब आहे. आयोजकांनी आरोग्य वारी हे नवीन रिंगण दिले असून ते पुढे कायम चालत रहावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास मंत्रिमंडळातील  माधुरीताई मिसाळ, खा. मेधाताई कुलकर्णी, आ. भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सदानंद मोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांच्यासह देहू-आळंदी देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख दिंड्यांचे दिंडी प्रमुख, सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.