राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन अत्यंत मोलाचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनमधील त्यांच्या कार्यालयात श्री गणेश मूर्तीची पूजा करून विधिमंडळ कामकाजास प्रारंभ केला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी संसदीय कार्यमंत्री या नात्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष, तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची संसदीय कार्यमंत्री या नात्याने भेट घेतली. राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन अत्यंत मोलाचे आहे. यावेळी विविध विभागांचे कामकाज, धोरणं आणि योजनांवर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
यासोबतच पाटील यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची संसदीय कार्यमंत्री या नात्याने भेट घेतली.