राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) आणि व्हिजन महाराष्ट्र 2047 या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

14

मुंबई : राजभवन, मुंबई येथे महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) आणि व्हिजन महाराष्ट्र 2047 या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शैक्षणिक धोरणासंदर्भातील कार्यशाळेचे आयोजन दर तीन महिन्यांनी उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत करण्यात येते. या पुढेही कार्यशाळेत ऑनलाईन माध्यमातून सहभागी होऊन मार्गदर्शन करण्याची विनंती पाटील यांनी राज्यपालांना केली.

महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ योजना तयार करणे पुरेसे नसून त्यांची व्यवहार्य अंमलबजावणी सातत्याने झाली पाहिजे. विद्यापीठांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणांकन पातळी सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विद्यापीठाशी थेट जोडलेले टास्क फोर्स स्थापन करून ते दर पंधरवड्याला प्रगती अहवाल सादर करतील अशी प्रणाली निर्माण करावी, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, विद्यापीठे ही विद्या आणि संस्कारांची केंद्रे असावीत. शिक्षक हे विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने जोडले जावेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद व सहकार्य वाढले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित होईल. तसेच खेळ, एनसीसी, एनएसएस यासारख्या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. तंदुरुस्त शरीर आणि सुदृढ मन हेच चांगल्या शिक्षणाचे आधारस्तंभ आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विद्यापीठांनी रोजगारक्षम अभ्यासक्रम विकसित करावेत जे थेट उद्योगजगताशी निगडित असतील. शिक्षण हे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीशी जोडले गेले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षण जितके गुणवत्तापूर्ण, तितकी शिक्षणाची गुणवत्ता उंचावेल. प्रशिक्षण केंद्रांचा दर्जा अधिक उंचवण्यावर भर देण्याचे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्ये यांविषयी संवेदनशील केले पाहिजे. जीवनमूल्यांची प्रेरणा देण्याऱ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. शिक्षण विभाग आणि विद्यापीठांनी परस्पर सहकार्याने सतत संवाद ठेवला पाहिजे. नियोजन, प्रशिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीवर काम केल्यास महाराष्ट्र निश्चितच देशातील आदर्श शैक्षणिक राज्य बनेल, असा विश्वासही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला.

या कार्यशाळेस उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.