उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू… अजितदादा… तुमच्याबद्दल असं काही व्यक्त होण्याची वेळ यावी, हे दुर्दैवच – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

26

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते, अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग होताना भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजितदादा… तुमच्याबद्दल असं काही व्यक्त होण्याची वेळ यावी, हे दुर्दैवच! माझ्यासाठीच नव्हे, तर तुमचं हे असं अकाली निघून जाणं सगळ्या महाराष्ट्रासाठीही दुर्दैवच, असे म्हणत शोक व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, अजितदादा, खरंच तुम्ही असं जायला नको होतं. महाराष्ट्राला, बारामतीला अजूनही तुमची गरज होती…एक राजकारणी म्हणून अजित पवार यांचा प्रवास खूप वर्षांपासून पाहिलाय. महायुती सरकारमध्ये अजितदादांचा पक्षही आला. त्यामुळे अजितदादांना आणखी जवळून पाहता आलं. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांची कार्यशैलीही पाहता, अनुभवता आली. त्यांच्या कामाचा झपाटा, निर्णय घेण्याची हातोटी, प्रत्येक विषयातला अभ्यास-माहिती, प्रशासनावरील पकड हे सगळं विलक्षण होतं.

पण अजितदादा फक्त राजकारणी म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही जवळून पाहता आले. कठोर, कठीण निर्णय घेताना ते कधी डगमगले नाहीत. प्रशासनातील अधिकारी असो वा पक्षाचा कार्यकर्ता, चुकीचं वागण्या-बोलणाऱ्याला त्यांनी नेहमीच खडेबोल सुनावले. पण व्यक्ती, राजकारणी म्हणून प्रसंगी कटू बोलणाऱ्या अजितदादांचा स्वभावाला आणखी एक किनारही होती. मिश्कीलपणाची. प्रसंगी एखाद्याला चार शब्द सुनावताना अजितदादा पटकन असं काही तरी बोलायचे की, त्यांची बोलणी खाणाराही नकळत हसायचा.

अजितदादांचा आणखी एक पैलूही नेहमीच लक्षात राहील. त्यांचं बारामती, जन्म-कर्मभूमीवरचं प्रेम. अगदी तरुण वयातच त्यांनी जिथून सामाजिक-राजकीय कारकीर्द सुरू केली, ती बारामती त्यांच्यासाठी नेहमीच खास होती. राजकारणातली एक-एक पायरी चढून वर येताना अजित पवारांचे अजितदादा झाले. त्यांनी स्वतःची, स्वतंत्र ओळख निर्माण केली ती, सामाजिक-राजकीय कार्यातून. तीच त्यांची खरी ताकदही होती. अजितदादांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्वतःची बलस्थानं नेमकी ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी नेहमी महाराष्ट्रालाच प्राधान्य दिलं. बारामती, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीच ते नेहमी झपाटून काम करत राहिले. एखाद्या राजहंसासारखं डौलदार असं अजितदादांचं व्यक्तिमत्व होतं.

आज अजितदादा आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाहीये. अजितदादा, तुमचा राजकीय प्रवास नेहमीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी राहील. तुमचं हे असं अकाली जाणंही नेहमीच अस्वस्थ करेल… परमेश्वर पवार कुटुंबाला, अजितदादांवर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो, हीच प्रार्थना, अशा शब्दात पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.