लोकशाही हा आपल्या देशाचा पाया आहे आणि मतदान हा प्रत्येक नागरिकाचा सर्वात महत्त्वाचा अधिकार व कर्तव्य ; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मतदारांना आवाहन
कोल्हापूर : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदांच्या ७३१ जागांसाठी आणि १२५ पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली आहे. आपल्या गावचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कोणाच्या हातात द्यायचा, हे ठरवण्याची हीच योग्य वेळ आहे, अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले आहे.
पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर काम करण्यासाठी सक्षम नेतृत्व निवडणे आवश्यक आहे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक मतदाराने बाहेर पडून आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे, असे पाटील यांनी नमूद केले. लोकशाही हा आपल्या देशाचा पाया आहे आणि मतदान हा प्रत्येक नागरिकाचा सर्वात महत्त्वाचा अधिकार व कर्तव्य आहे, असे पाटील यांनी म्हटले.
आज सायंकाळी ५:३० वाजता मतदानाची सांगता होणार आहे. येत्या ९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.