पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजली
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानभवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या.
यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार अमित गोरखे भीमराव तापकीर, राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, हेमंत रासणे, सुनील शेळके,शंकर जगताप, पुणे शहराचे महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पिंपरी-चिंचवडचे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राहणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, पालक सचिव व्ही. राधा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कार्यपद्धतील सूक्ष्म अभ्यासातून भविष्याचा वेध घेण्याचा आग्रह करणारे व्यक्तीमत्व होते. राज्याच्या प्रगतीत त्यांचे फार मोठे योगदान होते. जिल्हा नियोजन समितीची बैठक खऱ्याअर्थाने वेळेत सुरु करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे, अशा शब्दात पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अनुपस्थितीत पार पडलेली आजची बैठक मनाला वेदना देणारी होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, ही भावना सर्वांच्या मनात दाटून आली. दादांनी आपल्या कार्यातून उभा केलेला आदर्श आणि जनसेवेची परंपरा पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशी कृतज्ञ भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
भरणे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यासह पुणे जिल्ह्याचे नुकसान झाले असून त्यांची पोकळी न भरुन निघणारी आहे. राज्यासह पुणे जिल्हयाची प्रगती करुन सर्व क्षेत्रात पुढे जावे ही त्याचा मानस होता, त्यादृष्टीने सर्वांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. पायाभूत विकासाच्यादृष्टीने त्याचे आदर्श, विचार, कार्यपद्धती डोळ्यासमोर ठेवून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा प्रगतीचा आलेख पुढे नेण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करुया, अशा शब्दात श्री. भरणे यांनी आपले विचार व्यक्त केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच विरोधी पक्षनेता अशा विविध भुमिकेत आपली जबाबदारी पार पाडली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयाने कामे करीत असतांना विविध विकास मार्गी लागली. पायाभूत विकासाचे प्रकल्पाचे सादरीकरण समजून घ्यायचे, त्यामध्ये आवश्यतेनुसार बदल सूचवायचे. गेल्या 24 वर्षापासून त्यांच्यासमवेत काम करित असताना सदस्यांच्या शंकाचे निरसन करायचे, गोरगरीब सामान्य नागरिकांचे प्रश्न तळमळीने सोडवून त्यांना न्याय देण्याची त्यांची भुमिका होती, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी आपले विचार व्यक्त करुन त्यांचे लोकोपयोगी स्मारक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्रीमती मिसाळ म्हणाल्या, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम करिता जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या उपस्थितीत विधानभवन येथील झुंबर सभागृहात विविध बैठकीत आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आणि पुणे विधान भवन येथील झुंबर सभागृहाला अजित पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी श्रीमती मिसाळ यांनी केली.