जबाबदार वाहनचालक वृत्ती आणि प्रभावी जनजागृती मोहिमा राबवल्यास अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करता येईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : मुंबई विद्यापीठ येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय ‘युथ कॉन्क्लेव्ह ऑन रोड सेफ्टी’ परिषदेला उत्साहात प्रारंभ झाला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुखउपस्थिती होती.
यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून ती सामाजिक जबाबदारी आहे. युवकांनी ‘रस्ता सुरक्षेचे दूत’ म्हणून पुढाकार घेत नियमांचे काटेकोर पालन, जबाबदार वाहनचालक वृत्ती आणि प्रभावी जनजागृती मोहिमा राबवल्यास अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करता येईल, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
या परिषदेमुळे युवकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होईल तसेच सुरक्षित, शिस्तबद्ध आणि संवेदनशील वाहतूक व्यवस्थेसाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, युनिसेफ महाराष्ट्रच्या प्रतिनिधी सुश्री स्वाती मोहापात्रा, डॉ. रविंद्र बागल, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी मिलिंद काळे, कुलसचिव डॉ. प्रसाद करांडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.