संपूर्ण अधिवेशन कालावधीत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सभागृहात सकारात्मक चर्चा – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज दि. २५ मार्च, २०२६ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले. अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधान भवन, मुंबई येथे चहापानाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्री आणि दोन्ही सभागृहांचे सन्माननीय आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण अधिवेशन कालावधीत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सभागृहात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात जनहिताचे प्रश्न मांडताना जे निकोप वातावरण पाहायला मिळाले, ते यापुढे देखील कायम राहील असा मला ठाम विश्वास वाटत असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले. राजकीय मतभेद बाजूला सारून राज्याच्या प्रगतीसाठी अशा प्रकारे एकत्र येणे, ही आपल्या महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे आणि ती जोपासणे हे आपले कर्तव्य असल्याचे पाटील यांनी म्हटले.
विधानसभेत 197 तास 44 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 53 मिनिटे झाले. या अधिवेशनात सभागृहात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 86.53 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 78.84 टक्के इतकी होती. विधानसभेत 22 विधेयके पूर:स्थापित करण्यात आली आणि 22 संमत करण्यात आली. विधानपरिषदेने संमत केलेल्या विधेयकांची संख्या 4 होती. सभागृहात नियम 293 अन्वये एकूण 7 प्रस्ताव चर्चेला आले.
विधान परिषदेत १४३ तास ५१ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास ११ मिनिटे झाले. या अधिवेशनात सभागृहात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८३.५४ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ७३.७५ टक्के इतकी होती. विधानपरिषदेत ५ विधेयके पूर:स्थापित करण्यात आली तर ४ संमत करण्यात आली. विधानसभेने पारित केलेली १९ विधेयके विधानपरिषदेत संमत करण्यात आली. तर ४ विधेयके शिफारशींशिवाय विधानसभेकडे परत पाठविण्यात आली. सभागृहात नियम ९७ अन्वये एकूण प्राप्त सूचना ५४, तर ५३ सूचना मान्य करण्यात येऊन त्यावर चर्चा झाली.