तत्वनिष्ठ, व्यासंगी आणि इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार सरांचे निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी – मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर, २६ मार्च : मराठेशाहीचा देदीप्यमान इतिहास पुराव्यांसह जगासमोर मांडणारे उत्तुंग व्यक्तिमत्व, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी पहाटे वयाच्या ८५ व्या वर्षी कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिव-शाहू विचारांचा एक निष्ठावंत अभ्यासक हरपला असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
डॉ. जयसिंगराव पवार यांच्याप्रती दुःख व्यक्त करताना पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसापासून आजारपणामुळे कोल्हापूरातील रुग्णालयात भरती असलेल्या डॉ. जयसिंगराव पवार यांची रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. त्यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाची आजच्या तरुण पिढीला मोठी गरज असतानाच ते आज आपल्यातून निघून गेले आहेत.
राजर्षी शाहू महाराजांचे विचार जगभर पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आणि प्रसिद्ध ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ संपादित केला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई आणि सेनापती संताजी घोरपडे यांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकत मराठेशाहीचा इतिहास त्यांनी नव्या पिढीसमोर आणला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ‘शाहू संशोधन केंद्रा’ची स्थापना करण्यात आणि शाहू महाराजांच्या कार्याला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
मराठेशाहीच्या इतिहास संशोधनाला नवी दिशी मिळावी यासाठी त्यांनी कोल्हापूर येथे ‘महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी’ची स्थापना केली. इतिहासातील दुर्लक्षित पैलूंना प्रकाशात आणत इतिहास संशोधनातील त्यांचा वारसा पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या लेखणीत एक वेगळीच धार आणि सत्याचा आग्रह होता. कोल्हापूर भूषण, जिजामाता विद्वत्त गौरव आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले होते. तत्वनिष्ठ, व्यासंगी आणि इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार सरांचे निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांच्या शब्दांतून आणि संशोधनातून ते सदैव आपल्या स्मरणात राहतील. डॉ. जयसिंगराव पवार सरांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.