पुण्यात ‘गीतरामायणा’चा भक्तिमय सोहळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला सुरावलींचा आनंद
पुणे : ’स्वये श्रीरामानं नमुनी, गदिमांनी रचिलेले आणि बाबूजींनी (सुधीर फडके) आपल्या सुरावलींनी अजरामर केलेले ‘गीतरामायण’ म्हणजे मराठी संस्कृतीतील एक दैवी लेणे आहे. रामनवमीच्या या पवित्र पर्वावर, आज बाबूजींचे सुपुत्र श्री. श्रीधरजी फडके यांच्या ‘गीतरामायण’ कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून या सुमधुर काव्याचा आनंद घेतला.
यावेळी पाटील म्हणाले, गदिमांचे शब्द आणि बाबूजींचे संगीत यांनी सजलेली ही रामकथा ऐकताना मन प्रसन्न झाले. पिढ्यानपिढ्या मराठी मनावर संस्कार करणाऱ्या या रचनेतील प्रत्येक शब्द आजही तितकाच ताजा आणि भक्तीमय वाटतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभू श्रीरामाच्या जीवनप्रवासाचे स्मरण झाले आणि पुन्हा एकदा त्या सुवर्णकाळाचा अनुभव घेता आला. श्रीधरजींनी आपल्या स्वरांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने रंगवला. रामायणातील त्या भक्तिरसात न्हाऊन निघताना मनाला एक वेगळीच शांती लाभली असल्याच्या भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
‘गीतरामायण’ हे मराठी साहित्य आणि संगीत क्षेत्रातील एक अद्वितीय आणि अजरामर लेणे आहे. याची रचना आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांनी केली असून, त्याला स्वर आणि संगीत सुधीर फडके (बाबूजी) यांनी दिले आहे. बाबूजींनंतर त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी हा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे.