महाराष्ट्रात ५४ हजार कोटींची मोठी गुंतवणूक!… राज्याच्या औद्योगिक, आर्थिक प्रगतीला नवी दिशा आणि उज्ज्वल भविष्याची नांदी – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी गती देणारा निर्णय आज घेण्यात आला आहे. व्हिएतनाममधील जगप्रसिद्ध ‘विन ग्रुप’ (VinFast) या कंपनीने महाराष्ट्रात तब्बल $६.५ अब्ज (५४,००० कोटी रुपये) गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गुंतवणुकीबद्दल समाधान व्यक्त करत हा महाराष्ट्राच्या जागतिक प्रतिष्ठेचा विजय असल्याचे म्हटले आहे.
पाटील यांनी नमूद केले कि, या प्रकल्पामुळे राज्यात रोजगाराचे एक मोठे जाळे विणले जाणार आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील हजारो कुशल तरुणांच्या हाताला काम मिळणार असून, त्यांच्या भविष्याला एक नवी उभारी मिळेल. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर जागतिक कंपन्या महाराष्ट्रात येतात, तेव्हा केवळ उद्योगच वाढत नाहीत, तर त्यासोबतच रस्ते, वीज आणि दळणवळणासारख्या पायाभूत सुविधांचाही प्रचंड वेगाने विकास होतो. ही गुंतवणूक राज्याच्या अर्थव्यवस्थेला एका नवीन उंचीवर घेऊन जाणारी ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील यांनी म्हटले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘मेक इन इंडिया’ स्वप्नाला बळकटी देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले आहे. जागतिक गुंतवणुकीला महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राच्या विकासावर जागतिक पातळीवर उमटलेली ही विश्वासाची मोहोर असून, ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी आपण सर्वजण पूर्ण ताकदीने काम करत राहू, असे पाटील यांनी यावेळी म्हटले.