विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी, आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

125

मुंबई : महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला न्याय देण्यासाठी आणि बेधुंद सरकारच्या कामकाजाला लगाम लावण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची नेमणूक होणे आवश्यक आहे. संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक व्हावी. अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने ही नियुक्ती करावी, ही मागणी आज आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा कामकाज कार्यपद्धतीवर बोलताना केली.

वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेत्याची नेमणूक होते अशी परंपरा नाही. असे आम्ही पाहिले नाही. त्यामुळे नवीन परंपरा पाडू नये. महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आहे, त्यांना लगाम घालायला आणि महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची गरज आहे. विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये. अधिवेशनाचे अंतिम आठवड्याचे काम ती खुर्ची खाली ठेवून कामकाज होऊ नये. अध्यक्षांना अधिकार आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी वडेट्टीवार यांनी केली.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न प्रदान करण्याचा प्रस्ताव आज एकमताने मंजूर झाला हा आनंद

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न प्रदान करण्याचा प्रस्ताव आज एकमताने महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहात मंजूर झाला. याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार, स्त्री-शिक्षण आणि शेतकरी व श्रमिक वर्गाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातिव्यवस्थेविरोधात लढा दिला, तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणक्रांती घडवली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न देण्याची मागणी सातत्याने होत होती. आज एकमताने हा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर झाला हा आनंद आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.