छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्र कमजोर केला, त्यांना छत्रपतींच्या पायाशी स्थान मिळणार नाही ; संजय राऊत यांचे अमित शहांवर जोरदार टीकास्त्र

मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आहेत. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. शाह यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र कमजोर केला. त्यांना छत्रपतींच्या पायाशी स्थान मिळणार नाही, अशी जोरदार टीका राऊत यांनी केली.
अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कधीच आशिवार्द देणार नाही. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडण्याचा स्वप्न पाहिलं आहे. मुंबई लुटण्याचं स्वप्न पाहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र कमजोर केला. त्यांना छत्रपतींच्या पायाशी स्थान मिळणार नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
आमचे देवेंद्र फडणवीस राजकारण करत फिरत आहेत
यावेळी महाराष्ट्राच्या कायदा सुवस्थेसंबंधी माध्यमांकडून प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, कायदा सुव्यवस्था पाहण्यासाठीच अमित शाह येथे येत आहेत. या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची कायदा सुवस्था उरलेली नाही. आणि आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहोत हे देवेंद्र फडणवीस यांना लक्षात आलेले नाही. रोज मुंबई,नागपूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. गोळीबार, बलात्कार, खून अपहरणाच्या घटना घडत आहेत. पण आमचे देवेंद्र फडणवीस राजकारण करत फिरत आहेत.
संपूर्ण देशात राणा फेस्टीव्हल साजरा करतील
राणाला भारतात खटला चालवून फासावर लटकवण्यासाठी आणला आहे की क्रेडिट घेण्यासाठी आणला आहे., अशी टीकाही राऊत यांनी केली. त्यांना राणा फेस्टीवल करायचा आहे. या देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे पण तुम्ही क्रेडिट कसले घेत आहात. पुलवामाचे क्रेडिट घ्या, कुलभूषण जाधव यांना तुम्ही सोडवू शकले नाहीत त्याचेही क्रेडिट घ्या. क्रेडिट कसले घेत आहात तुम्ही दहशतवादाचं. बिहार किंवा पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशात राणा फेस्टीव्हल साजरा करतील. ही यांची योजना असल्याचे राऊत यांनी म्हटले.