आमदार शंकर जगताप यांच्या विशेष सहकार्याने काश्मीरमध्ये अडकलेली पिंपरी-चिंचवडमधील चार कुटुंबं सुखरूप परतली

पिंपरी चिंचवड : काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील काही कुटुंबं अडकल्याची माहिती येथील आमदार शंकर जगताप यांना मिळाली. ही बाब समजताच शंकर जगताप यांनी तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत संपर्क साधून त्यांच्या विशेष सहकार्याने या कुटुंबांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात आली.
आमदार शंकर जगताप यांच्या विशेष सहकार्याने गिरीश नायकवडी, पाटील, आगारखेड आणि पवार कुटुंबांतील एकूण १४ सदस्य शनिवारी पुण्यात सुखरूप परतले आहेत. संकटाच्या वेळी आपल्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे कर्तव्यच असल्याच्या भावना यावेळी शंकर जगताप यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या चेहऱ्यावर परतल्यावर उमटलेला आनंद पाहून खरे समाधान लाभले असल्याचे देखील ते म्हणाले.
या सर्व कुटुंबीयांनी जगताप यांची भेट घेऊन मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या आनंदाने आणि समाधानाने मला अधिक ऊर्जा मिळाली आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आणि विश्वास याच माझ्या कार्याचा खरा आधार आहे. मी सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन असा विश्वास यावेळी जगताप यांनी व्यक्त केला.