पीक विम्याबाबत कृषी विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

सांगली : जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2025 आढावा बैठक सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके वेळीच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उपलब्ध व्हावीत. यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश या बैठकीत पाटील यांनी दिले.
चंदकांत पाटील यांनी सूचना दिल्या कि, शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. बोगस खते, बी-बियाणे याबाबत कृषी विभागाने सातत्याने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करून धाक निर्माण करावा. बोगस खते, बियाणांची विक्री होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. गत वर्षातील बोगस खते व बियाणे बाबत अंतिम कारवाई काय केली झाली याबाबत सविस्तर माहिती द्यावी. विविध योजनांच्या लाभासासाठी शेतकरी ओळखपत्राचे महत्व खूप आहे, ते शेतकऱ्यांना पटवून सांगावे व त्यानुसार सर्व शेतकऱ्यांचे ओळखपत्र काढण्यासाठी कार्यवाही करावी. पीक विम्याबाबत कृषी विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांची ओढ व्हावी यासाठी कृषी विभागाने एक गाव पूर्णपणे नैसर्गिक शेतीसाठी निवडावे. त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देऊ व उत्पादनात झालेल्या तुटीसाठी त्यांना अर्थसहाय्य देऊ, असेही आश्वासित केले.
बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, कोल्हापूर विभागीय कृषि सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक अभयसिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.