‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे कठोर प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैनादलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

ठाणे : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे कठोर प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैनादलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज ठाण्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरातील शहीद स्तंभाला तसेच महापराक्रमी योद्धे स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा देत व तिन्ही सैन्यदलांचा जयजयकार करत ही रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये असंख्य शिवसैनिक आणि ठाणेकरांनी सहभाग घेत भारतीय सैन्य दलाने दाखवलेला त्याग, बलिदान आणि धाडसाचे कौतुक केले. प्रत्येक भारतीय नागरिक हा सैन्य दलाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनातील भावना ओळखून पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटूंबियांच्या वतीने पाकिस्तानचा बदला घेतला असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक मनोज शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.