लेंगरेमध्ये महायुतीचा झंझावात; शेतकरी आणि महिला सक्षमीकरणाच्या जोरावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विजयाचे आवाहन

6

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या लेंगरे गट तसेच पंचायत समितीच्या लेंगरे व पारे गणातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ लेंगरे येथे आयोजित चौक सभेस उपस्थित राहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदार बांधवांशी संवाद साधला.

यावेळी संवाद साधताना पाटील म्हणाले, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करून मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार १९६ पैकी खानापूर तालुक्यातील तब्बल ४० हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. जिल्ह्यातील ६ लाख ९९ हजार ९७६ बहिणींना तर तालुक्यातील ४५ हजार ३१६ महिलांना या योजनेचा थेट लाभ होत आहे.

टेंभू व इतर उपसा सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागाला पाणी मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच लेंगरे व पारे भागातील ग्रामीण रस्त्यांचे डांबरीकरण व मजबूतीकरण मोठ्या प्रमाणात होत असून विकासाची गती वाढत आहे. त्यामुळे मोदीजी व देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी भाजपाचे नेते वैभव पाटील, दाजीबा पवार, संग्राम माने, अविनाश काथे, राजू जानकर, महेश कराडे, उत्तम कदम, जिल्हा परिषद लेंगरे गटाच्या उमेदवार आरती मोरे, लेंगरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार स्वाती कदम, पारे पंचायत समिती गणाच्या उमेदवार प्रियंका साठे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व लेंगरे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.