लोककल्याणकारी योजनांचा वेग कायम ठेवण्यासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली :सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जत तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शेगांव जिल्हा परिषद गट आणि शेगांव-कोसारी पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी शेगांव येथे भव्य चौक सभा पार पडली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सभेला संबोधित करताना जतच्या पाणीप्रश्नावर विशेष भाष्य केले
सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या सिंचन प्रकल्पांमुळे दुष्काळी जत तालुक्यात आता प्रगतीच्या नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. म्हैशाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना पूर्णत्वाकडे जात असून, अनेक गावांना आणि शेतीला पाणी मिळू लागले आहे. हे पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचवणे हा आमचा ठाम निर्धार आहे
शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील ३,८६,१९६ शेतकऱ्यांना तर जत तालुक्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून तालुक्यातील ८६,३७५ महिलांना आधार मिळत आहे. या लोककल्याणकारी योजनांचा वेग कायम ठेवण्यासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, उमेदवार डॉ. शिवाजी खिलारे, सचिन बोराडे, अर्चना पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.