मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडसाठीच्या पाठपुराव्याला मोठे यश; कोथरुड मधील पानशेत पुरग्रस्तांचा बहुप्रलंबित प्रश्न मार्गी
पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, कोथरुड मधील पानशेत पूरग्रस्तांचा वर्षानुवर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांना मालकी हक्क बहाल केला आहे. त्याबद्दल पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत.
१२ जुलै १९६१ रोजी पुण्यात पानशेत धरण फुटीमुळे झालेल्या भीषण पुरात सुमारे १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू आणि ६५,००० पेक्षा जास्त लोक विस्थापित झाले होते. या दुर्घटनेनंतर पानशेत पूरग्रस्तांना शहराच्या वेगवेगळ्या भागांत पुनर्वसन करण्यात आले.
आज ही त्या जागांवर सध्या तिसरी पिढी राहात आहे. तरीही, त्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला आहे. पूरग्रस्तांना त्यांच्या घरांचा मालकी हक्क मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. तसेच, त्यांची वाढीव बांधकामे नियमित करण्याता प्रश्न रखडला होता.
हा प्रश्न सुटावा यासाठी चंद्रकांत पाटील सातत्याने प्रयत्नशील होते. १५ जून २०१८ मध्ये या संदर्भात ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन आणि महसूल विभागाची जबाबदारी असताना, त्यांनी याबाबत बैठक घेऊन यासंदर्भात अडचणी समजून घेतल्या होत्या. तसेच पूरग्रस्तांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करुन, जलदगतीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
मात्र, तांत्रिक अडचणींमुळे सदर विषयांचा निपटारा करताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, पाटील यांचा मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरुच होता. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय या दोन्ही स्तरावरील पाठपुराव्यामुळे पूरग्रस्तांना अखेर न्याय मिळाला आहे. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदतवाढ देखील मिळाली आहे. त्यामुळे याबद्दल पूरग्रस्तांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
पाटील यांची संवेदनशीलता आणि पाठपुराव्याबद्दल पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी त्यांचे आभार मानले असून, समितीच्या वतीने लवकरच त्यांचा नागरी सत्कार करणार असल्याचे जाहीर केले आहे.