समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे : बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. पुण्याच्या पाणी पुरवठ्यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर आधारित सामान पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लवकरच केले जाणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.
समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येत्या 17 मे रोजी या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण करण्याचा निर्णय चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठकीत घेतला आहे. या पहिल्याटप्प्यात बाणेर – बालेवाडी परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
यासोबतच पाटील यांनी महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच पाणी मोजणीसाठी मीटर लावावे, अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, 24×7 योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप आदी उपस्थित होते.