ऑपरेशन सिंदूर… पहलगाम हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई, पाकिस्तान आणि पीओके येथील ९ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश संतप्त होता. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घेतली होती. याला प्रत्युत्तर म्हणून आज भारताने भल्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून नियोजनबद्ध, अचूक हल्ले करत दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यांत दहशतवाद्यांचे तळ आणि मुख्यालये उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
ऑपरेशन सिंदूर च्या कारवाईनंतर भारतीय सेनेकडून महत्वाची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. भारतावर आत्तापर्यंत झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांच्या व्हिडिओनेया प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात झाली. त्यात पहलगाममधील हल्ला देखील दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये 26 लोक मारले गेले होते. गेल्या दशकभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 350 भारतीयांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाल्याचे व्हिडीओत नमूद करण्यात आले होते. दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करणं हाच या ऑपरेशनमागील उद्देश होता, असं भारताने स्पष्ट केलं आहे. भारताने आपल्या या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केलेलं नाही. या ऑपरेशनमध्ये फक्त पाकिस्तान आणि पीओके येथील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, हवाई दलातील व्योमिका सिंग आणि त्यांच्यासोबत लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थितांना ऑपरेशन सिंदूरबद्दल संपूर्ण माहिती दिली. भारताच्या विरोधात हल्ले होतील हे आम्हाला इनपूटद्वारे कळलं होतं. भारतावर पुन्हा हल्ले होतील अशी गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे हे रोखणं आवश्यक होतं. त्यामुळे आज मध्यरात्री भारताने त्याला चोख उत्तर दिलं आहे. ही कारवाई अत्यंत महत्त्वाची होती, असे विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले.
यावेळी लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या माहिती देताना सांगितलं की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली.या ऑपरेशनमध्ये कोटली अब्बासमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलं . या छावणीत सुमारे 1500 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. याशिवाय, पाकिस्तानी पंजाबमधील बहावलपूर आणि महमूना झोया येथेही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मुरीदके येथील मरकज तैयबा देखील उद्ध्वस्त करण्यात आला आहे. हे लष्कराचे मुख्यालय असल्याचे म्हटले जाते आणि दहशतवादी अजमल कसाबलाही येथून प्रशिक्षण मिळाले होते.