मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार येणार – नारायण राणे

मुंबई:भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यात भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. मार्च महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार आहे, असे विधान नारायण राणे यांनी केले आहे. जयपूर दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी हे विधान केले आहे. राणे यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
नारायण राणे बोलतांना म्हणाले, ‘महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही त्यामुळे तिथं तसं होतंय. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.’
दरम्यान नारायण राणे यांनी भाजपमध्ये आल्यापासून अनेकदा सरकार कोसळणार असल्याच्या भविष्यवाणी केल्या आहेत. कधी दिवाळीनंतर सरकार कोसळेल, तर कधी नव्या वर्षात सरकार कोसळेल असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, राणेंनी दिलेल्या डेडलाईनमध्ये सरकार काही कोसळलेलं नाही. त्यामुळे राणेंनी आता केलेली भविष्यवाणीही केवळ हुलबाजी असल्याचं बोललं जात आहे.