यापुढे म्हाडाच सर्व परीक्षा घेणार, विद्यार्थ्यांना शुल्क परत करणार; जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा

ठाणे: म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. खासगी संस्थांकडून परीक्षा घेण्यात येत असल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत. त्यामुळे या पुढे म्हाडाच सर्व परीक्षा घेणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे आता घेतलेले शुल्क परत करण्यात येईल. शिवाय पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. रविवारी म्हाडाच्या परिक्षा घेण्यात येणार होती. मात्र, पेपर फुटण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडाला मिळाली असल्याने पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे पेपर फुटण्यापूर्वीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या संदर्भात आव्हाड यांनी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती.

प्रश्नपत्रिकेबाबत एकाच व्यक्तीला माहिती होती. प्रश्नपत्रिका छपाईला गेल्यावर संबंधित कंपनीने त्या प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेऊ नयेत, असे स्पष्ट नियम असतानाही या कंपनीच्या मालकाने सदर प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेवली. त्याने गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिक्षेत काही गैरप्रकार होणार असल्याचा संशय आपणाला या आधीच आला होता. त्यामुळेच आपण तीन दिवसांपूर्वीच गैरप्रकार आढळल्यास परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला होता, असं आव्हाड यांनी सांगितलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!