कांदा आणि कापूस उत्पादकांसाठी महाविकास आघाडीचा शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल

4
आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरवातीलाच आक्रमक ठरला. कांदा प्रश्नी विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर जोरदार अंदोलन केले. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांसह आता आमदार कांदा प्रश्नी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
‘सरकार प्रचारात व्यस्त’, ‘कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त’, ‘शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘कापसाला भाव मिळालाच पाहिजे’, ‘हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘दोन रुपयाचा चेक देणार्या सरकारचा निषेध असो’, ‘शेतकऱ्यांची चेष्टा करणार्या सरकारचा निषेध असो’, ‘गद्दार सरकार जोमात…शेतकरी मात्र कोमात’, ‘कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारने कापसासाठी निर्यात धोरण तयार करावे व कांद्याला योग्य हमी भाव मिळायला द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी यावेळी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.