शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग – अजित पवार

अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकरी अडचणीत आले असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. नाफेडकडून अजूनही शेतमाल खरेदी सुरु नाही, सरकारकडून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षाने सभागृहातून सभात्याग केला.
सरकारच्या वतीने सभागृहात करण्यात आलेले निवेदन अपुरे आहे. अनेक नुकसानग्रस्त भागांचा उल्लेख या निवेदनात नाही. राज्यातला शेतकरी हतबल असताना सरकारने बघू, करु अशी उत्तरे न देता शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी मागणी अजित पवारांनी केली.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे झालेच पाहिजेत…अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे… जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.