पुणे : विधानसभा निवडणुकीत भाजपाने आपलं वर्चस्व अबाधित राखत मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये दिमाखदार विजय मिळवला. या बलाढ्य विजयाबद्दल आणि या विजयाला मूर्त स्वरूप देण्याऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रति उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, भारतीय लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या राजकारणात एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकतर्फी यश मिळणं हे दुर्मिळ आहे. विशेषतः सर्व न्यूज पेपर,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे सर्वे चुकीचे ठरवून दैदिप्यमान यश मिळवले आहे. हे सगळं यश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. २०१४ पासून मोदींनी सर्वसामान्य लोकांशी नाळ जुळवली. मोदीजी निवडणुकीमध्ये उतरले कि यश १०० टक्के मिळणार असे पाटील म्हणाले.
गरजूना मोदींनी गॅस कनेक्शन उपलब्ध करू दिले. अनेकांना घर वाटप केली. सर्वसामान्य माणसाला मोदीजी हे मसीहा वाटायला लागले. एक देवदुर्लभ नेतृत्व या पक्षालाच नाही तर या देशाला मिळाले असल्याचे पाटील म्हणाले. त्यामुळे कोणीही कितीही म्हटले, कोणीही कितीही टीका केली तरी मोदीजी हे सरळ चालत असतात. निवडणुकीमध्ये मिळालेले सर्व श्रेय हे मोदीजींचं आहे. त्यांचे चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी , गृह तथा सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या अथक परिश्रमामुळेच हा विजय संभव झाला असल्याचे पाटील यांनी म्हटले. जनतेचे देखील पाटील यांनी आभार मानले आहेत.