येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

133
जळगाव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इंडोअर विभाग, योग शास्त्र विभाग आणि पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभाग इमारतीचे लोकार्पण आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी विद्यापीठाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.  येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही.  जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली.

उद्घाटनानंतर विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात मुख्य समारंभ झाला.  यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाषणाच्या आधी विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रश्न विचारण्याची संधी दिली. यामध्ये दोन विद्यार्थी, एक प्राध्यापक यांनी प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देतांना एक महत्वाची घोषणा करावयाची आहे. मुख्यमंत्री शिंदे हे स्वत: संवदेनशील असल्यामुळे परभणीतील एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर त्यांनी मुलींच्या शुल्क माफी विषयी चर्चा केली होती. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्याच्या ६४२ आणि नव्याने सुरु होणाऱ्या २०० अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रात एकाही विद्यार्थिनीला शुल्क भरावे लागणार नाही.  कववित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला स्थापनेनंतर शिक्षकांची नवीन पदे मंजूर झालेली नाहीत.  ही परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी येत्या मंगळवारी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन आजवर विद्यापीठाने शिक्षक पदांसाठी दिलेले प्रस्ताव आणि त्यांची स्थिती याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल असे आश्वासन दिले. माजी प्राचार्य अनिल राव यांनी याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या विद्यापीठात प्लेसमेंटसाठी सातत्याने मोठया कंपन्या याव्या यासाठी आपण स्वत: काही कंपन्यांशी बोलू असेही ते म्हणाले.

गेल्या दीड वर्षात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात देशात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.  या शैक्षणिक धोरणात प्रात्यक्षिकावर अधिक भर देण्यात आला आहे.  विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बंधनकारक आहे.  अगदी ग्रामीण भागातील महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी देखील ग्रामपंचायत कार्यालयात इंटर्नशिपचा अनुभव घेऊ शकतील.  या धोरणात ७० टक्के अभ्यासक्रम हा विषयाशी निगडीत असला तरी ३० टक्के अभ्यासक्रम हा व्यक्तिमत्व विकासाला पूरक ठरणारा आहे असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी जर्मन देशाला कौशल्य असलेले ४ लाख मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मन भाषा शिकण्यापासून ते थेट जर्मनीत जाण्यापर्यंतचा खर्च घेण्याची जबाबदारी उचलली आहे.  त्यामुळे जर्मन भाषा शिकण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असेही ते म्हणाले. नवीन २ हजार प्राध्यापकांच्या भरतीला परवानगी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.  प्राध्यापकांनी विद्यार्थी हितासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, कुलगुरू डॉ. बी. एल. माहेश्वरी , प्र कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल पाटील, प्रा. पवित्रा पाटील, नवीन शैक्षणिक धोरणाच्या समितीचे सदस्य प्रा. अनिल राव, यांच्या सह विद्यापीठ अधिसभा सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.