उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन

36

 

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल काल जाहीर झाला. यंदा राज्यातील २३ हजार २८८ माध्यमिक शाळांमधून १५ लाख ४९ हजार ३२६ नियमित विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यातील ९५.८१ टक्के म्हणजेच १४ लाख ८४ हजार ४४१ विध्यार्थी यावेळी यावेळी उत्तीर्ण झाले.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सर्वप्रथम दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या बहुसंख्य विद्याशाखांपैकी तंत्र शिक्षण ही एक विद्या शाखा आहे. या विद्याशाखेतून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञ, अभियंता व उद्योजक होता येते. १०वी नंतर तीन वर्ष कालावधीचे तंत्रशिक्षण घेवून अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला या पदविका ( पॉलिटेक्निक ) अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता प्रवेश प्रक्रिया दिनांक २९ मे २०२४ पासून सुरु होत आहे. पदविका प्रवेशासाठी सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण तपशील, प्रवेशासंबंधीची माहिती घेण्यासाठी तसेच नाव नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या असे आवाहन देखील त्यांनी यामाध्यमातून केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.