राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही… राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे वाद किरकोळ आहेत, असे म्हणत महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याविषयी त्यांनी मार्ग खुला असल्याचे मतं मांडलं. उद्धव ठाकरेंनीही अगदी काही वेळात याला प्रतिसाद देत, आपल्याकडून काही भांडणं नव्हती. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायलाही तयार आहोत असं मुंबईत जाहीर कार्यक्रमात म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे बंधू आता एकत्र येणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. यातच उद्धव ठाकरे गटाची भूमिका खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली आहे.
संजय राऊत यांनी म्हटले कि, दोघेही भाऊ आहेत. काही राजकीय मतभेद झाले असतील. राज ठाकरेंचं वक्तव्य आणि मी उद्धव ठाकरेंचंही भाषण ऐकलं. महाराष्ट्र हितासाठी मी वाद मिटवायला तयार आहे, असं ते म्हणालेत. लोकसभा निवडणुकांवेळी उद्धव ठाकरे हेच सांगत होते. वाद भांडण नाही आणि मिटवायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या या फौजा आहेत. आम्ही वेट अँड वॉचच्या भुमिकेत आहोत. आम्ही सकारात्मक भूमिकेतून याकडे बघतोय, असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
राऊत पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रातील शूत्रंना मदत होईल अशी भूमिका घेऊ नये, असं आम्ही सांगितलं होतं. हे योग्य नाही महाराष्ट्राला परवडणारे नाही, ही भूमिका आजही आमची आहे. महाराष्ट्राचे शत्रू आमचे शत्रू अशी भूमिका कोणी घेत असेल तर आमचे स्वागत आहे. सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, बोलतात वेगळं आणि करतात वेगळं , अशांना आम्ही थारा देणार नाही, हा विचार राज ठाकरेंनी करणं गरजेचं आहे, साद प्रतिसादाची भूमिका घेतली असेल तर सकारात्मक भूमिकेतून आम्ही पाहात आहोत. राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही, असे स्पष्टोक्ती राऊत यांनी केली.
मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. आमच्यातले वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे एकत्र येणं, राहणं कठीण नाही, असं मोठं विधान मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलं आहे.