अमरावतीकरांना संचारबंदीतून दिलासा; संपूर्ण बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत उघडण्याची मुभा
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2021/11/AMRAVATI-1-750x430.jpg)
अमरावती: अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आता अमरावतीकरांना आजपासून संचारबंदीतून मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती शहरात आजपासून सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. तर रात्री 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.
अमरावती शहरात घडलेल्या हिंसक घटनांच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेली संचारबंदी रात्री कायम ठेवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या आदेशानुसार, 23 नोव्हेंबरपासून म्हणजेच, आज सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत शहरात संपूर्णपणे संचारबंदीत सूट देण्यात आली आहे. रात्री 9 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.
त्याचप्रमाणे पूर्वी दिलेल्या सवलतीही कायम राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. हिंसाचारानंतर सायबर पोलिस सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यात सात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कोणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओ पाठवू नका. असे आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. अमरावती हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत सुमारे 55 गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण 312 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.