भारत-पाकिस्तान तणावामुळे बीसीसीआयचा मोठा निर्णय… आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने स्थगित

आयपीएल २०२५ : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज बीसीसीआय एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. देशात सुरु असलेले आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत नुकतीच अधिकृत घोषणा केली आहे. याआधी, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणांमुळे ब्लॅकआऊटची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता बीसीसीआयने सर्व संघ मालकांसोबत चर्चा करून आयपीएल तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएलचे एकूण १६ सामने शिल्लक होते. हे १६ सामने आता नंतर खेळवण्यात येतील. मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही. पाकिस्तानकडून 8 तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यामुळे धर्मशाला इथे सुरु असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. पाकिस्तानकडून अधून मधून होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयकडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुरूवारी रात्री पाकिस्तानने ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हा हल्ला परतावून लावला. या युद्धामुळे भारताने अंतर्गत खबरदारी घेतली असून सीमाभागांमध्ये ब्लॅकआऊट आणि देशातील २६ विमानतळे बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम आयपीएलच्या सामन्यांवरही झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळल्याने आयपीएलमधील सर्व संघांमध्ये अनेक परेदशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.