नारी शक्तीला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : संसदेत नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून महिलांचे हक्क डावलणाऱ्या काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या विरोधात मंगळवारी मुंबईत भव्य ‘जन आक्रोश महिला संमेलन’ पार पडले. वरळी येथील एनएससीआय (NSCI) डोममध्ये आयोजित या संमेलनातून “महिलांच्या सन्मानात, भाजपा मैदानात” अशा घोषणा देत विरोधकांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला. या ऐतिहासिक संमेलनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमीत साटम, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार तसेच पदाधिकारी आणि प्रचंड संख्येने माता-भगिनी या वेळी उपस्थित होत्या.

यावेळी संबोधित करताना फडणवीस म्हणाले, संसदेत व विधानसभेत मातृशक्तीला योग्य स्थान मिळेपर्यंत नारी शक्ती वंदन मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिला आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता; मात्र काँग्रेसने याकडे कधीही गांभीर्याने पाहिले नाही. 2023 मध्ये ‘नारी शक्ती विधेयक’ मंजूर होणार हे माहीत असल्यामुळे विरोधकांनी दिखाऊ समर्थन दिले; मात्र आता बहुमताचा प्रश्न निर्माण होताच त्यांनी खरा चेहरा दाखवत विधेयकाला विरोध केला. महिलांच्या सक्षमीकरणाच्या मार्गा अडथळा आणण्याचे काम विरोधकांनी केले आहे.
विरोधकांनी नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाला विरोध करून देशाच्या प्रगतीत अडथळा आणला आहे. आता संसदेत व विधानसभेत 33% महिला प्रतिनिधी निवडून येतील तेव्हाच ही लढाई थांबेल. नारी शक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे फडणवीस म्हणाले.
नारी शक्ती वंदन विधेयकाची वाट संसदेत विरोधी पक्षांनी रोखली. अर्थात, काँग्रेसचं महिलाविरोधी राजकारण यात कळीचा मुद्दा होता. त्यामुळे आता देशातील माता-भगिनींना ३३ टक्के आरक्षण मिळण्याची वाट बिकट झाली. संसदेत या विधेयकाला विरोध करणाऱ्यांचे भेसूर चेहरे सगळ्या देशानं पाहिले. माता-भगिनींच्या नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारनं हे विधेयक संसदेत आणलं, हे सत्य आणि त्याला विरोध करणाऱ्यांचे भेसूर चेहरे माता-भगिनी कधीही विसरणार नाहीत. या विधेयकाची वाट रोखणाऱ्या काँग्रेसविरोधात मंगळवारी जन आक्रोश महिला संमेलन झालं. वाट रोखणाऱ्या, हक्क नाकारणाऱ्या काँग्रेसला आमच्या संतापाची धग प्रत्येक निवडणुकीत पराभवाचे चटके देईल, असा इशाराच जणू या संमेलनात उपस्थित हजारो माता-भगिनींनी दिला.