महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला मुंबईत सुरुवात; संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री गणेश पूजन आणि दिग्गज नेत्यांचे स्वागत
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या बहुप्रतीक्षित पावसाळी अधिवेशन-२०२६ ला आजपासून मुंबईतील विधान भवन येथे अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनमधील आपल्या अधिकृत कार्यालयात विधिवत श्री गणेश मूर्तीची पूजा-अर्चा करून विधिमंडळाच्या कामकाजाचा यशस्वी प्रारंभ केला.
संसदीय कार्यमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवन येथे आगमन झाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदरपूर्वक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संसदीय लोकशाहीच्या परंपरेनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली.
त्यानंतर, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संसदीय कार्यमंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचे विधान भवनात आगमन झाल्यावर त्यांचे मुख्य प्रवेशद्वारावर शासकीय प्रोटोकॉलनुसार अत्यंत उत्साहात स्वागत केले.
पावसाळी अधिवेशन-२०२६ दरम्यान राज्याच्या आणि जनतेच्या हिताचे विविध महत्त्वाचे कायदे, जनहितार्थ निर्णय आणि धोरणात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी महायुती सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी विधिमंडळाचे वरिष्ठ अधिकारी, अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.