कसब्यात भाजपाचा विजयाचा संकल्प! संजय काकडे यांच्या वतीने भव्य विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन

12

पुणे : भाजपा व महायुतीच्या विजयासाठी कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ आज विजयाचा संकल्प करण्यात आला. कसबा पेठ मतदार संघातील 9 ते 10 हजार कार्यकर्त्यांच्या विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केले होते. या विजय संकल्प मेळाव्याने कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील भाजपच्या विजयाची गुढी उभारली.

भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, पतित पावन संघटना, लहुजी शक्ती सेना महायुतीचे कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांच्या वतीने या विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, भाजपाचे उमेदवार हेमंत रासने, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, उमेदवार हेमंत रासने, लहुजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे, रिपाइंचे परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक शंकर पवार, अर्चना पाटील, प्रमोद कोंढरे, अजय खेडेकर, योगेश समेळ, सम्राट थोरात, गायत्री खडके, विष्णू हरिहर, आरती कोंढरे, राजेश येनपुरे, सुलोचना कोंढरे, मनीषा लडकत आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हा विजय संकल्प मेळावा विजयाची नांदी ठरला आहे. याच्या यशस्वी आयोजनाबद्दल या मेळाव्याचे संयोजक भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज विजय संकल्प मेळावा आयोजित करून संजय नाना काकडे यांनी कसबा पेठ मतदार संघातील भाजपचा विजय निश्चित केला आहे.

लोकसभेत ज्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही. महाराष्ट्रात ज्यांचं अस्तित्व नगण्य राहिले आहे. अशा पक्षाच्या उमेदवाराला निवडून देऊन फायदा काय होणार असा सवाल करून चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे गल्ली ते दिल्ली सरकार असल्याने विकासाची गंगा तळागाळात नेण्यासाठी हेमंत रासने यांना विजयी करा असे आवाहन केले.

केंद्रात मोदी सरकार आणि महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार वेगाने विकासाचे निर्णय घेत आहे. कसबा मतदार संघातील वाड्यांचे प्रश्न आणि इतर सर्व समस्या सोडविण्यासाठी केंद्रातील व राज्यातील सरकार मदत करेल. हे काम विरोधी पक्ष करणार नाही. त्यामुळे आपला आमदार हा भाजपाचा असेल तर विकासाची गती अधिक राहील, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, विकासाला गती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू आहे. पायाभूत सुविधा वेगाने होत आहेत. मेट्रो, रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न सोडविण्यासाठी दूरदृष्टीकोनातून प्रयत्न मोदी, शिंदे व फडणवीस सरकार करीत आहे. कसबा मध्ये विकासाची गती कायम ठेवण्यासाठी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा.

भाजपाचे उपाध्यक्ष व विजय संकल्प मेळाव्याचे संयोजक संजय काकडे म्हणाले, “आपण प्रत्येक जण कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील आहात. आपण प्रत्येकाने सात ते आठ लोकांना मतदानासाठी घेऊन जायचं आहे. असे झाल्यास केवळ आज उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळेच भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना 70 ते 80 हजार मतदान मिळेल. याबरोबरच प्रत्येक नगरसेवकाने देखील ही निवडणूक महापालिकेची निवडणूक समजून काम करावे. यापद्धतीने काम झाल्यास भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा विजय निश्चित आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवार गेली 20 वर्षे नगरसेवक आहे. इतक्या वर्षात त्यांनी केलेली विकासाची पाच कामे सांगता येत नाहीत. ही निवडणूक विधानसभेची आहे, राज्याची आहे. त्यामुळे मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विकासाची कामे लक्षात ठेवून भाजपाला मत द्यावे.”

कसबा मतदार संघाच्या विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान करण्यासाठी मला मत द्या, अशी विनंती उमेदवार हेमंत रासने यांनी केली.

माजी आमदार सुधाकर भालेराव, लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख विष्णू कसबे, शैलेश टिळक, माजी नगरसेविका अर्चना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी भोईराज मित्र मंडळ, परीट समाज, मुस्लिम महिला संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.