दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 69 व्या राष्ट्रीय अधिवेशनात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी बिजमाता सुश्री लहरीबाई, शरद सागर आणि वैभव भंडारी यांना स्वर्गीय यशवंतराव केळकर युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यापैकी बिजमाता सुश्री लहरीबाई यांच्याशी चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधून त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेतली.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, मध्य प्रदेशातील डिंडोरी या वनवासी भागात देशी वाणांचे जतन आणि संवर्धनाचे कार्य लहरीबाई यांनी सुरू करुन त्याला व्यापक स्वरुप मिळवून देण्यात यश मिळवले आहे. लहरीबाई यांनी अनेक दुर्मिळ बियांचे जतन केले आहे ज्या केवळ लोकांच्या ताटातुनच नाही तर शेतातूनही गायब झाल्या आहेत. त्यांच्या बीज बँकेत बाजरीच्या 150 हुन अधिक दुर्मिळ बिया आहेत. त्यामुळे लहरीबाई यांच्या कार्याची दखल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेऊन त्यांना एक ओळख दिली आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, विद्यार्थी परिषदेकडून अशा व्यक्तीचा मानाच्या पुरस्काराने गौरव होत आहे, हे अतिशय आनंदाचे आणि तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहे.